Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीच्या रणरागिणींनी सर केले कळसुबाई शिखर

 

 


सांगली : भ्रमंती एक्स्प्लोरर्स अँड ट्रेकर्स, सांगली तर्फे आयोजित महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल अन् लांब अशी सांधन दरी नुकतीच सांगलीच्या रणरागिणींनी सर केली. या साहसी व थराराने भरलेल्या ट्रेकमध्ये जवळपास १४ महिला, ३ विद्यार्थी आणि ७ पुरुष सहभागी होते. विशेष म्हणजे तोंडाच्या कर्करोगावर मात केलेल्या तासगावच्या निहा परवीन गौस आत्तार हिने अत्यंत जिद्द, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा अवघड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला.

सांगली येथील रणरागिणींनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सर केले.  कळसुबाई शिखर हे महाराष्ट्र राज्यामधील सर्वात उंच शिखर आहे. या कळसुबाई शिखराची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे १६४६ मीटर एवढी आहे. याच कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.

याआधी ट्रेकर्सनी सांधन दरीचा रोमांचकारी अनुभव घेतला. उंच कातळकडे, अरुंद दगडी वाटा आणि निसर्गरम्य दृश्यांनी सर्वांना भुरळ घातली. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत दोरीच्या साहाय्याने काही अवघड टप्पे पार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील अत्यंत धाडसाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेक पूर्ण केला.

या गिर्यारोहणामध्ये रागी शितोळे, आयुष शिंदे, अथर्व काकडे ही शाळकरी मुले सहभागी होती. त्याशिवाय क्रांती पाटील, सुचेता घुली, अमृता पाटील, भाग्यश्री पाटील, रक्षणदा औताडे, भाग्यश्री काटकर, गौरी पाटील, सुचित्रा कद्दू, शकुंतला सरगर, अदिती पाटील, वैशाली पाटील या महिलांनी, तर टी. पी. पाटील, किरण पाटील, पंकज रसाळ, सचिन माने, रोहित औताडे या सांगलीकरांनी हा ट्रेक यशस्वी करून दाखविला. ट्रेकदरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लास्टिकमुक्त भ्रमंती करण्याचे आवाहनही सुदर्शन चोरगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments