Ticker

6/recent/ticker-posts

टपाल विभागाकडून गंगाजलासह आता तीर्थक्षेत्रांचा महाप्रसादही मिळणार घरपोच

 


सांगली: पारंपरिक पत्रव्यवहार आणि बचत योजनांबरोबरच धार्मिक सेवांमध्येही भारतीय टपाल विभागाने आता पाऊल टाकले आहे. व्यावसायिक वृद्धी मोहिमेंतर्गत नागरिकांच्या धार्मिक आस्था लक्षात घेऊन एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. व्यावसायिक वृद्धीसाठी गंगेचे पवित्र जल आणि महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा महाप्रसाद भाविकांना घरपोच देण्याचा निर्णय घेतला आहे.

काही कारणांनी प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रांना जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना लाभदायी आहे. डिजिटल युगाशी सुसंगत राहून ऑनलाइन मागणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना घरबसल्या गंगाजल व प्रसाद मिळणार आहे.

महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा प्रसादही मिळणार

पोस्ट विभागाने राज्यातील विविध देवस्थान विश्वस्तांसोबत व्यावसायिक करार केला आहे. यामुळे केवळ टपाल किंवा पार्सलच नव्हे, तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि शक्तीपीठांचा पवित्र प्रसाद आता पोस्टाच्या माध्यमातून नागरिकांच्या थेट घरापर्यंत पोहोचणार आहे.

कुठे उपलब्ध आहे गंगाजलची सेवा ?

सांगली शहरातील सांगलीच्या मुख्य पोस्ट कार्यालयात नागरिकांना या सुविधेचा लाभमिळणार आहे. यासह टपाल विभागाच्च्या अधिकृत ऑनलाइन माध्यमातून ऑर्डर करता येते. गंगाजलच्या २५० मिली क्षमतेच्या बाटलीसाठी ३० रुपये शुल्क आहे. सांगली विभागीय डाक घर अंतर्गत मिरजचे मुख्य कार्यालय, विश्रामबाग येथील पोस्ट कार्यालय तसेच जिल्ह्यातील तासगाव, विटा, शिराळा, उरुण ईश्वरपूर, जत, कवठेमहांकाळ आदी पोस्टाच्या कार्यालयात गंगाजल उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील काही निवडक पोस्ट कार्यालयामध्ये गंगाजल उपलब्ध आहे. जिल्ह्यातील देवस्थानांनी पोस्ट कार्यालयाशी करार केल्यास भाविकांसाठी तेथील प्रसाद पोस्टाद्वारे थेट घरापर्यंत तसेच देशभरात कोठेही पाठविण्याची सुविधा टपाल विभाग करून देऊ शकतो. यासाठी देवस्थान समितीने आमच्याशी संपर्क करावा., असे आवाहन अर्जुन इंगळे, प्रवर डाक अधीक्षक, सांगली डाक विभाग यांनी केले.

पोस्टाकडून 'गंगाजल' घरपोच मिळणार

शारीरिक अस्वस्थता किंवा लांबच्या प्रवासामुळे अनेक भाविकांना गंगा -यमुनोत्रीला जाणे शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी टपाल विभागाने मुख्य कार्यालयांत गंगाजल उपलब्ध केले आहे. हे जल थेट गंगोत्री येथून संकलित केलेले असून, ते शुद्ध स्वरुपात भाविकांना मिळते. यासाठी ग्राहकांना ठराविक शुल्क भरावी लागते.

Post a Comment

0 Comments