आटपाडी : सांगली जिल्ह्यातील
बनपुरी (ता. आटपाडी) येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना
गुरुवारी उघडकीस आली. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप मुलींना रात्रभर
हात-पाय बांधून उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ करण्यात आल्याने दहा वर्षीय
सानिकाचा मृत्यू झाला, तर तिची ११ वर्षीय बहीण अनुजा गंभीर
जखमी अवस्थेत सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात
संतापाची लाट उसळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाना हैबत
यमगर या निर्दयी बापाने पोटच्या दोन मुलींना अमानुष मारहाण करत जीव घेतला आहे.
केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या
दोन चिमुकल्यांचा निर्दयी छळ करण्यात आला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,
बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि
अनुजा या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले.
रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने
तडफडत ‘पाणी,
पाणी’ म्हणून ओरडत होत्या. मात्र, त्यांच्याच
आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना वरती बांधून निष्ठूर
आई-वडील घरातच निर्धास्त झोपले होते, तर बाहेर आजी-आजोबा
झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला होता. तर आई-वडील
पोटच्या मुलीच्या मृतदेहाखालीच निर्धास्तपणे झोपले होते.
गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजता
मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर
झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा
बेशुद्धावस्थेत होती. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत
सानिकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे ती मृत असल्याचे
डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह घरी आणला.
ही घटना बाहेर येऊ नये म्हणून
संबंधित कुटुंबीयांनी मयत सानिकाचे अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची
धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडील, आजी-आजोबा तसेच काही
नातेवाइकांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर
आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार सांगितला. ‘आम्हाला वडिलांनी
हात-पाय बांधून उलटे टांगले आणि मारहाण केली,’ असे तिने
सांगितल्याने डॉक्टरांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि प्रकरणाचा
भांडाफोड झाला.
या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक
प्रकार समोर आला आहे. मुलींना सोडणाऱ्या आजोबांवरच मुलीच्या वडिलांनी कोयत्याने
हल्ला करत त्यांना धमकावले होते. यामुळे कुटुंबातील अंतर्गत वाद आणि क्रौर्याची
परिसीमा स्पष्ट होत आहे.
सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल
तपास सुरू असून,
संबंधित आरोपींवर खून व खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल
होण्याची शक्यता आहे. बनपुरीसारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण
तालुका हादरला असून, ‘अशा निर्दयी लोकांना कठोर शिक्षा झालीच
पाहिजे,’ अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांतून
व्यक्त होत आहे.
0 Comments