सांगली : पर्यावरण
आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा
परिषद प्रशासनाने शासकीय कार्यालयांमध्ये काटकसरीच्या उपाययोजनांची कठोर
अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य
प्रशासन) प्रमोद काळे यांनी सर्व विभागप्रमुख, गटविकास
अधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे.
शासनाने इंधन बचत, ऊर्जा बचत,
सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि पर्यावरण संरक्षणासाठी विविध
उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार खाद्यतेलाचा वापर कमी
करण्यासाठी जनजागृती आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी घरा-घरांत जाऊन
खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी जनजागृती करण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश
देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर कार्यालयांना
आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
शासकीय कामासाठी मंजूर परदेश दौरे रद्द करावेत, नव्या
दौऱ्यांचे नियोजन करू नये, शासकीय कामांसाठी इलेक्ट्रिक
वाहनांना प्राधान्य द्यावे, कार्यालयीन कामासाठी वाहनांचा
मर्यादित वापर करावा, एकत्रित प्रवास करावा, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हास्तरीय बैठका, प्रशिक्षण व
सेमिनार ऑनलाईन घ्यावेत, तसेच कार्यालयांतील कामकाज
संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक,
वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवावी, असे आदेश
देण्यात आले आहेत.
0 Comments